अस्मान कडाडून गेला ..............
मराठी कवी मनमोहन यांनी सावरकरांची अजरामर उडी आपल्या हृदयस्पर्शी काव्यातून दाखवण्याचा केलेला एक प्रयत्न …
गोदेच्या घाटावरले ,घट्टे पडलेले हात
मोरिया बोटीवरती ,गुंतले कडी कुलुपात
हेलकावत सागर होता , बिसकेच्या आखातात । ।
निबिडातून नैराश्याचा । मग प्रकाशरेषा दिसली ।
बोटीतील डेकावरती वाटोळी खिडकी दिसली
घेतला रोधुनी श्वास , संकुचित केले अंग ।
खिडकीवर धडकत होती उद्धट लाटांची रांग ।
त्या ताठ तुफानाहुनही , छाती याची उत्तुंग ।
देशाचा जयजयकार करुनी
मारिला सूर वीरांनी
टाकिले गगन भरोनि
रवि शशी भंजनाला । अस्मान कडाडून गेला ।
कृष्णाच्या अन्गुलीवरच्या । चक्रापरी तो गरगरला ।
कर्णाच्या पृथ्वीवरल्या । गुंतल्या रथावर चढला ।
शिल्पकार संह्याद्रीचा
भाष्यकार भवितव्याचा
परमेश्वर हा प्रतिभेचा
कल्पात व्याह्ळून तरला । अस्मान कडाडून गेला
अशी हि उडी बघतांना । कर्तव्य मृत्यू विसरला ।
बुरुजावर फड फडलेला। झाशीतील घोडा हसला ।
वासुदेव बळवन्तांच्या। कंठात हर्ष गद्गद्ला ।
क्रांतीच्या केतुवरला । अस्मान कडाडून गेला ।
फेसाच्या जाळ्यामध्ये दर्या चघळायासाठी ।
बंदुकीची गोळी याच्या मस्तकास चाटून जाई ।
देशाच्या सेवेसाठी
तोडिल्या जीवाच्या गाठी
लावियले रक्त ललाटी
ये भगवती राक्षयाला । अस्मान कडाडून गेला ।
चपलेच्या चंचल्याने
पाण्यासी कापी वेगाने
चुकवीत गोळ्या इर्षेने
फ्रान्सचा किनारा भिडला । अस्मान कडाडून गेला ।
या भूमीवरती आहेत विख्यात बहाद्दूर दोन ।
जे गेले आईकरिता । सागरास ओलांडून ।
हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान । अस्मान कडाडून गेला ।