Wednesday, June 8, 2016

माय.. maay..

माय 

आईची थोरवी अगाध  आहे ,तिची महता शब्दात व्यक्त करणे अशक्यच आहे.  ' स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ' असे म्हंटले आहे ते उगीच नव्हे. या कवितेत आईचा काटकपणा, सोशिकता व स्वतःच्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी  यांचे मार्मिक वर्णन हृदयाचा ठोका चुकावतेच शिवाय आपल्या आईप्रतीची एक अनामिक ओढ निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावते. वामन निंबाळकरांची  हि कविता म्हणजे त्यांची आपल्या  आईबद्दलची एक जागृत प्रेमज्योतच आहे जी आज अनेकांना दीपस्तंभ बनू  पाहतेय ……  



जसा दिस बुडून जाई  काळोखाचे राज्य असे 
आम्ही बसू दरवाज्यात झोपडीत साधा दिवा नसे  

घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे
  भाकरी जात बडविल्या कुठे चून कुठे वांगे 

 नाकात जाई वास त्याचा पोटात असे अंधार सारा 
तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यात धारा 

अंधाराला चिरत तेंव्हा एक सावली जड येई 
डोई तिच्या भर असे, चालतांना तोल जाई 

काळी काळी , कृश देह, ती असे माझी माय 
वणवण सकाळपासून  मोळीसाठी रानात जाय

वाट  पाहत बसू कधी तिची , सारे आम्ही भाऊ 
मोळी नसे विकत तेंव्हा , भुकेलेले झोपी जाऊ 

एकदा काय झाले कसे ,आम्हा काही कळले नाही 
माय आली पाय बांधून, भळभळा रक्त वाही 

चावला साप मोठा काळा  दोन बाया होत्या सांगत 
फणा  काढून मारला त्याने हळूच गेला निघून रांगत

माय पडली धरणीवर …. गंडे झाले, मंत्र झाले, वैद आला 
दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला 

हंबरडा फोडला आम्ही,तो विरला वाऱ्यावर 
माय तरी सोडून गेली चिल्लेपिल्ले वाऱ्यावर 

शोधते माझी नजर माय  आता मी उदास होतो 
दिसता कृश मोळीवाली  मोळी तिची विकत घेतो 


                                                               -- { वामन निंबाळकर  }


संग्रहीत :
( इयत्ता आठवी  बालभारती -२०१०)

No comments:

Post a Comment