आयुष्य जगतांना अनेक वासना तयार होत असतात, पण त्या स्वकेंद्री असतात त्यात विश्वव्यापकतेची भावना नसते, ना इतरांचे भले करण्याची सुप्त इच्छा . पण अशातच एक कवी येतो आणि विश्वव्यापकतेतून विध्वबंधुत्वाचे पसायदान आपल्या लेखणीतून मांडतो आणि त्याचे हे काव्य अजरामर होऊन अनेकांच्या मनमंदिरातील प्रेरणारुपी गाभाऱ्यात सहजतेने वास करते .
अनंता एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे
उडाया पाखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे ।।
घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल
कुण्याही माय पदराशी , खेळते राहू दे मूल ।।
फुलांचा भार न व्हावा, कधीही कोणत्या देठा
चालत्या पावलांसाठी, असू दे मोकळ्या वाटा ।।
तान्हुल्या बाळ ओठांचा ,तुटो ना दे कधी पान्हा
असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा ।।
चालता तिमिर वाटेने , सोबती चांदणे यावे
घणांचे घाव होतांना , फुलांनी सांत्वना द्यावे ।।
कितीही पेटू दे ज्वाला , जळाचा जाळ ना व्हावा
बरसत्या थेंबथेंबांचा, भुईतूनी कोंब उगवावा ।।
अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे
शेवटी श्वास जातांना, फुलांचे रंग मी व्हावे ।।
--- लक्ष्मीकांत तांबोळी
बालभारती
इयत्ता आठवी
Wow my favorite poetry my
ReplyDelete.अप्रतिम .
ReplyDelete