Friday, May 29, 2015

परीक्षाकाळातील एक संध्याकाळ …….



परीक्षेचा काळ होता … 
दिवसभर अभ्यास करून 
शरीराला जडत्व आलेले 
मनाने तर कोमेजलेल्या फुलागत 
केंव्हाच मान  टाकलेली … 
अशा त्या चलबिचल अवस्थ्येत  
अभ्यास तो काय होणार 
चला म्हंटल घेऊ जर विसावा 
आलो सहज गच्चीवर 
पाय ठेवता तिथे… उडाला पक्षांचा थवा 
हवेचा हळुवार स्पर्श ,
मनाला ताजेपणा देणारा … 
अस्ताचलाकडे झुकणारा सूर्य 
रोजच काहीतरी नव कोड उलगडणारा ……
पश्चिमेकडील  ती लालसर कडा …… 
दूरवर कुठूनतरी येणारा मंद घंटांचा नाद …. 
आणि रस्त्यावरची तीच नेहमीची गतिमानता 
मधूनच होणारी पानांची सळसळ 
आणि पक्षांची आपल्या पिलांजवळ 
शिघ्रत्वाने  जाण्याची तळमऴ   ….   
प्रत्येक गोष्ट स्पर्शून जात होती मनाला 
तिच्यातला हळुवारपणा ,नाजूकता आणि निसर्गत्व 
नजरेच्या पडद्याआड आकलत होतो… 
मनातल्या प्रत्येक विचाराला 
एक नवीन दिशा मिळत होती
प्रत्येक डोकावणाऱ्या प्रश्नाला 
त्या निरागसतेत  उत्तरे सापडत होती … 
मधूनच डोकावणारी भूतकाळातील गोड आठवण 
तिथेच रमवत होती …
मग माझ्यातली  संध्याकाळ पुन्हा वर्तमानात आणत होती… 
प्रत्येकाला अशी एक संध्याकाळ हवी असते 
जी  अलगद आपल्याला ताजेपणा देते …. 
विचारांना धार येते,
मनाला नाविन्यता …. 
कोमेजलेल्या फुलांमध्ये 
जीवनामृताची पाझर फुटते …. 
एकटेपणा तर नसतोच तेंव्हा 
लोपलेल्या सूर्यानंतर प्रत्येक तारा  डोकावतो जेंव्हा ……. 
पसरणाऱ्या काळोखात 
प्रकाशाची मशाल घेउन…. 
गुरफटलेल्या मनाला 
सागराची अथांगता देऊन …
मग ते आपोआप ध्येयाकडे आकर्षित होते 
पावले घरात येतात 
आणि पुन्हा आभ्यासाला सुरुवात होते …. 
  

                                      -   वेदांत